मराठी कॉर्नर सभासद

Friday, November 20, 2009

स्त्री मुक्ती

स्त्री मुक्ती

स्त्री मुक्ती म्हणजे नेमके काय ? हे सर्वात पहिले आपण जाणुन घेतले पाहीजे. स्त्री मुक्ती म्हणजे निव्वळ पुरुषांच्या विरोधात जाणे नव्हे तर `पुरुषप्रधान' संस्कृतीचा पगडा असलेल्या विशिष्ट पद्धतीचा विरोध करणारी चळवळ. पूर्वीची जाचक बंधने आज स्त्रियांवर नाहीत. पण याचा अर्थ स्त्री सर्वार्थाने मुक्त झाली असा होत नाही. स्त्री-मुक्ती चळवळी ठिकठिकाणी कार्यरत आहेत. हे विचार, ह्या चळवळी शहरापुरत्याच मर्यादित आहेत. दलित, आदिवासी, शोषित, पीडीत स्त्रियांना त्याही खेड्यात राहणाऱ्या स्त्रियांना या चळवळीची सुतराम कल्पना नाही.

आर्थिक, बौद्धिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने शिरकाव केलेला आहे. पुरुषांनी स्त्रियांना मुक्त केले, मोकळीक दिली, स्वातंत्र्य दिले. त्यातून त्यांची मानसिकता किमान बदलली आहे. स्त्रियांना मुक्ती हवी म्हणजे काय हवे? कोणापासून मुक्ती हवी? स्त्रियांच्या कार्यक्षेत्राबाबतचा अन्याय आता थोडा कमी झालेला दिसतो. आता असे कोणते क्षेत्र आहे की, तेथे महिला नाहीत? न्यायिक विभाग, महसूल खात्यात जिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत. पोलिस खात्यात सर्वोच्चपदी महिला आहेत. रिक्षाचालक, टॅक्‍सी ड्रायव्हर, रेल्वे इंजिन ड्रायव्हर, विमानचालक, बस कंडक्‍टर, तसेच विविध क्षेत्रांत अधिकारीपदी, सर्वोच्चपदी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात महिला अग्रेसर आहेत. एवढेच नाही तर राष्ट्रपती, पंतप्रधान, या पदावर देखील महिला आरूढ झाल्या आहेत. एवढा पराक्रम त्या करू शकतात; मग त्या मुक्ती कोणापासून मागतात? तर या सर्व क्षेत्रात काम करत असताना त्या दुहेरी भूमिका निभावतात आणि अशा वेळी त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्याचं काम रूढी, परंपरा करत असतात. महिलांना मुक्ती हवी ती बुरसटलेल्या रूढी परंपरांपासून वखवखलेल्या नजरांपासून, सासू, सून, नणंद, भावजया, त्यांच्या आया इत्यादी छळवादी महिलांकडून. स्त्री ही पुरुषाइतकीच स्वतंत्र आहे.

समजा कुटंबात एक मुलगा, एक मुलगी असेल तर आई मुलीला सांगते, बाई गं, तुझे हे काम आहे, आता हुंदडणे बंद कर. जरा स्वयंपाक -पाण्यात लक्ष घाल. घरकामाचं बघ. मुलाला मात्र यातील काहीच आई सांगत नाही तिचे बंधन फक्त मुलीला; मुलाला नाही. म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती कोण चालवते ? मुलीला गौण आणि दुय्यम स्थान स्त्रीच बहाल करत असते. संस्कार करायचे, शिस्त लावायची तर मुलगा मुलगी दोघांनाही सारखीच लागली पाहिजे. कामाची वाटणी समान झाली पाहिजे. हे चक्र कुटुंबापासून पुढे जाईल.अनेक कुटुंबे मिळून समाज तयार होतो. म्हणजे कुटुंबापासून सुरुवात केल्यास त्याचा परिणाम समाजावर होतो. समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक कुटुंब आहे. यातून कामाच्या समान वाटणीची समाजाला सवय लागेल. ती आपल्या प्रत्येक घरातून लागणार आहे. याचे आपण भान ठेवले पाहिजे. स्त्री-पुरुष आचार-विचार, संस्कारात समानता आणणारी स्त्रीमुक्ती हवी आहे...

स्त्रियांच्या मनावर, बुद्धीवर, रूढी परंपरेचे, पुरुषप्रधान संस्कृतीचे थरच्या थर साठलेले आहेत. ते अगोदर गळून पडायला हवे. स्त्री-मुक्ती चळवळींनी काही गोष्टींचा नको तेवढा विपर्यास केला, अतिरेक केला. उदा. कुंकू, बांगड्या, साड्या किंवा अन्य पारंपरिक वेशभूषा, केशभूषा झिडकारणे आणि शर्ट पँट घालून बॉयकट करून पुरुषी वागणे म्हणजे स्त्री-मुक्ती, अशी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला गेला. मुलगी म्हणून जन्माला येणं हे काही स्त्रिच्या हाती नाही. पण पुढे वंश चालू राहायचा तर मुलगी म्हणजे स्त्री हवीच. आईलाच आपल्या स्त्रीत्वाचा विसर पडावा अन्‌ पोटी मुलगी जन्माला येऊ नये याचा खटाटोप तिनं करावा, यापेक्षा स्त्रीजातीचा मोठा अपमान कोणता असेल? स्त्रीचा उभा जन्म अनेक बंधनात अडकलेला असतो. आता खरी गरज आहे, स्त्रियांनी आत्मपरीक्षण करण्याची, त्यांच्यात भरपुर ताकद आहे, ही पुरुषप्रधान संस्कृती संपविण्याची, पण त्याकरिता स्त्रियांनी आपली मानसिकता बदलायला हवी, आणि स्त्रि मुक्तिची चळवळ योग्य दिशेने न्यावयास हवी.

Sunday, November 8, 2009

हे जपण्याचा प्रयत्न करा

हे जपण्याचा प्रयत्न करा

आई आणि वडील रात्री खुप उशीरा कामावरून येतात. दोघेही थकलेले आणि त्रस्त झालेले असतात. त्यांचा ६ वर्षाचा मुलगा त्यांची वाट पहात दाराजवळ बसलेला असतो.

मुलगा :- आई बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू ?

वडील :- हो अगदी, निसं:कोचपणे.

मुलगा :- बाबा तुम्ही किती पैसे कमाविता ?

वडील :- हा काय प्रश्न आहे?

मुलगा :- आई तु किती पैसे कमाविते?

आई वडील :- अरे पण तुला काय करायचंय त्याचं ?

मुलगा :- मला फ़क्त जाणुन घ्यायचंय. कि तुम्ही दोघे एका तासाला किती पैसे कमाविता? आई (चिडुन) :- १०० रुपये

मुलगा :- आणि बाबा तुम्ही ?

वडील (रागावुन) :- २०० रुपये.

मुलगा थोडावेळ विचार करून : बाबा मला तुम्ही १०० रुपये द्याल?

वडील (चिडुन) :- तुला जर कुठलेही फ़ालतु खेळणे विकत घ्यायचे असेल तर गप्प बस. आणि मुकाट्याने आपल्या खोलीत जाऊन अभ्यास कर नाहीतर झोपायला जा. माझं डोक उठवू नकोस.

मुलगा :- आई तु तरी मला १०० रुपये देशील ?

आई :- आता बर्‍याबोलाने खोलीत जातो कि एक फ़टका पाहिजे. मुलगा शांतपणे आपल्या खोलीत निघुन जातो. आईवडील जेवायला बसतात आणि एकमेकांना मुलाच्या वागण्यावरून नाही नाही ते बोलतात. थोड्यावेळाने दोघेही शांत होतात आणि विचार करतात कि त्यांचा मुलगा काही कारण असल्याशिवाय असे पैसे मागणार नाही. नक्कीच काहीतरी कारण असेल. असे म्हणुन त्याच्या खोलीकडे जातात.

वडील :- का रे झोपलास का ?

मुलगा :- नाही बाबा जागाच आहे. का?

आई :- काही नाही रे आम्ही मघाशी तुझ्यावर विनाकारण चिडलो.

वडील :- आम्ही आमच्या ऑफ़िसचा राग तुझ्यावर काढला.

मुलगा :- जाऊ द्या ना बाबा.

वडील :- नाही ते काही नाही, हे घे तुला १०० रुपये पाहीजे होते ना.

(असे म्हणुन मुलाला १०० रुपये देतो) मुलगा आनंदाने त्याच्या पुस्तकामध्ये ठेवलेले पैसे काढतो. ते बघुन आईवडीलांचा राग अनावर होतो. तो लहान मुलगा त्याचे जवळचे पैसे मोजतो आणि छानंसं हसतो. ते पाहुन वडील अजुनच चिडतात.

वडील :- जर तुझ्याजवळ एवढे पैसे होते तर आम्हाला मागायची काय गरज होती?

मुलगा :- कारण माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते.

आई :- पण एवढ्या पैश्यांचं तु काय करणार आहे. काही नाही तुला आता फ़टकावलाच पाहीजे.

मुलगा :- थांब आई मला मारू नकोस. आई हे घे १०० रूपये आणि बाबा हे घ्या २०० रूपये. आता मी तुमचा एक तास विकत घेऊ शकतो का? प्लीज उद्या तुम्ही दोघे ही लवकर घरी या. मला घरी एकटं राहून कंटाळा आलाय, मला तुमच्यासोबत खेळायचंय आणि जेवायला जायचंय.

आईवडील त्या मुलाला बिलगुन ढसाढसा रडायला लागले.

या कथेतुन बोध :

ज्याच्यांवर तुम्ही प्रेम करता त्यांच्यासोबत चांगला वेळ तुम्ही घालवत चला. जे आईवडील त्यांच्या जीवनात कष्टाने काम करीत आहे. त्यांच्यासाठी ही एक प्रांजळ सूचना. आपल्या हातातुन अशी वेळ सुटु देऊ नका. तुमच्या जीवनात ज्यांचे मोलाचे स्थान आहे त्यांच्या सोबत ती वेळ तुम्ही सत्कारणी लावा. जर उद्या आपला मॄत्यु झाला तर ज्या ऑफ़ीससाठी आपण अहोरात्र काम करतो त्या ऑफ़ीसला तुमच्या जागी दुसरा व्यक्ती काही दिवसात मिळेल. पण आपली जी जिवाभावाची लोकं आहेत त्यांच्या जीवनात आपल्या जाण्याने होणारी उणीव कधीच भरून निघणार नाही. विचार करा. कुणालाही गॄहीत धरू नका. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना तुमच्या जवळ धरून चला. कारण एकेदिवशी तुम्ही उठाल आणि तुम्हाला जाणवेल की काही दगडं शोधण्याच्या ध्यासात तुम्ही हातातील हिरे गमावुन बसला आहात.

विचार करा

विचार करा

सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे आणि सामर्थ्य हे पुरुषांचे सौंदर्य आहे.

एक अतिशय अनमोल दागिना स्त्रिया फ़ारच कमी वापरतात तो म्हणजे मौन.

परमेश्वर जेव्हा शिकाऊ होता तेव्हा त्याने पुरुष निर्माण केला व तरबेज झाल्यावर त्याने निर्मिलेली कलाकृती म्हणजे स्त्री.

स्त्रीला सांभाळण्याचा फ़क्त एकच मार्ग आहे, आणि तो कुणालाच माहीत नाही.

वरील वाक्ये वाटतात लहान पण आयुष्याचा अर्क त्यात सामावलेला आहे. आजची परिस्थिती, वास्तविकता व वरील वाक्ये यात बराच विरोधाभास आहे. स्त्रीची अनेक रुपं आहेत, मग ती, आई, मुलगी, बहीण, पत्नी, नणंद, भावजय ( जाऊ ), सासु, मावशी, आत्या, आजी इत्यादी. अश्या अनेक रुपाने स्त्रीने समाजमन व्यापुन टाकले आहे.

वरील वाक्यांचा भावार्थ लक्षात घेता स्त्रीची अनेक रुपं उलगडल्या जातात. आज समाजामध्ये आई-वडील-मुलगा, सासु-सासरा-सून, पती-पत्नी, आजी-आजोबा-नातु/नात यांच्यातील विसंवादाचे दर्शन प्रामुख़्याने घडत आले आहे. याला सर्वस्वी जबाबदार कोण ? उत्तर एकच "स्त्री". स्त्री ही पुख़राज ख़ड्याप्रमाणे असते, एकतर आबाद करते नाहीतर बरबाद.

आजकालच्या कौंटुबिक दृश्यामुळे स्त्री ने स्त्रीलाच बरबाद करण्याच्या कितीतरी घटना बघावयास मिळतात. पुर्वीच्या काळी मुलीचा जन्म नकोसा असायचा. पण आजही परिस्थितीत विशेष फ़रक पडला नाही. एकीकडे जगदंबा, रेणुका, तुळजाभवानी यांची भावभक्तीने पुजा करायची व दुसरीकडे मुलीचा जन्म स्वागतार्ह मानायचा नाही. असे दुभंगलेले समाजजीवन किती दिवस जगायचे. पुरुषाने स्त्रीवर बळजबरी, अत्याचार केले तर त्याला नराधम म्हणायचे मग स्त्रीने स्त्रीवर केलेल्या अत्याचाराला काय म्हणणारं ? उत्तर अगदीच अवघड आहे. आजवर अनेक सामाजिक संस्था स्त्रीवरील अत्याचारासाठी हिरीरीने कार्य करीत आहे पण स्त्रीने स्त्रीवरील केलेल्या अत्याचाराला कुठेही तोंड फ़ुटलेले नाही. समाजाची संवेदनाचं जणु हरवुन गेलेली आहे.

आजपावेतो सगळीकडे सासुने, पतीने, सास-याने स्त्रीवर केलेल्या अत्याचाराबद्द्ल चर्चा सुरु होती. आजही हुंडाबळी, स्त्रीभ्रुण हत्या, बलात्कार, छळवणुक याची सजीव उदाहरणे आहेत. परंतु स्त्रीवर्गातील एक घटक जो कायम वृद्ध मातापित्यांवर अत्याचार करीत आहे त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात येत आहे. केवळ असेच घडत नाही की सासुच तिच्या सुनेचा छळ करते. आज अशीही उदाहरणे आहेत की सुनांच्या छळवणुकीमुळे स्त्री तिचे मातृत्व व पुरुष त्याचे पितृत्व हरवुन बसला आहे.

मध्यंतरी, "बागबान", "तु तिथं मी", "आई", हे हृदयस्पर्शी चित्रपट येऊन गेलेत. हे चित्रपट बघताना वृद्ध मातापित्यांच्या भावना उचंबळुन आलेल्या मी पाहिल्या आहेत. ते चित्रपट फ़क्त आलेत आणि गेलेत. पण दुर्दैवाने वास्तविकता वेगळी आहे. आज समाजात असे अनेक वृद्ध मातापिता आहेत ज्यांचा शेवट नक्कीच "बागबान" किंवा "तु तिथं मी" सारख़ा होत नाही. आता तुम्ही म्हणालं की या वृद्धांसाठी अनेक वृद्धाश्रम आहेत, त्यांचे उर्वरीत आयुष्य तिथे सुलभरित्या जाईल पण ज्यांनी आपल्या अपत्यासाठी, अनेक हाल-अपेष्टात जीवन काढले त्यांच्या शेवटच्या काळात अशी उदासीनता त्यांच्या नशीबी यावी, यालाच दुर्दैव म्हणतात. सभोवतालच्या वृद्ध मातापित्यांवर कोसळलेल्या आभाळाकडे पाहुन मेंदु विटल्यासारख़ा झाला आहे,

आजकालच्या पिढीतील काही अपत्ये आईवडीलांचे ॠण मान्य करतात परंतु वेळ आली की, त्याला सोयिस्करपणे कर्तव्याचा साज चढवुन त्यांना दु:ख़ देण्यास मोकळी होतात. आपण दररोज पेपर, बातम्यात ऐकतो की, सासुने सुनेचा छळ केला, या प्रकाराला बहुतांशी प्रसिद्धी दिली जाते पण त्याचबरोबर सुनांकडुन सासु-सास-यांना होणा-या छळाची कुठेही वाच्यता केली जात नाही. सासुरवासा इतक्याच सुनवासाच्या घटना घडत आहेत.

कायद्यात कलम १२५ फ़ौजदारी प्रक्रिया संहितेत, बायको, मुलगा, वृद्ध मातापिता यांच्या उदरनिर्वाहाची तरतुद आहे. परंतु स्त्रीला तिच्या पतीकडुन पोटगी मिळण्याकरीता या कलमाचा जेवढा उपयोग झाला त्याच्या निम्म्याहुन निम्मा उपयोग वृद्ध मातापित्यांच्या पोटगी साठी झाला नाही, यावरुन वेगळे दुर्दैव ते काय !

काही वास्तववादी घटना नाट्यप्रवेशाच्या माध्यमातुन खालीलप्रमाणे मांडत आहे.

प्रवेश पहिला :

स्थळ : नर्सिंग होम.

वातावरण : प्रसन्न

आई :- नको रे बाबा अश्या येरझा-या घालु. सगळं काही व्यवस्थित होईल बघं.

मुलगा :- ते सर्व ठीक आहे आई, पण मला तुझ्या सुनेच्या प्रसववेदनांचे आवाज सहन होत नाही. मी देखील माणुस आहे शेवटी. काय करू ?

आई :- हो रे बाळा तुला देखील गुलाबासारखा टपोरा मुलगाच होईल बघ.

मुलगा :- हो गं आई आशा तर तीच आहे बघुया काय होतंय ते.

नर्स :- अभिनंदन, तुम्हाला गोड मुलगी झाली.

मुलगा :- हुं

आई :- अरे देवा, तुझ्या नशिबी टपोरा गुलाब होता ही शेवंती कुठुन आली. भोग तुझ्या बायकोच्या कर्माची फ़ळं दुसरं काय.

प्रवेश दुसरा :

प्रसंग : औक्षवाणाचा

आजी :- आत्या घ्यानं तुम्ही ओवाळुन माझ्या नातवाला

आत्या :- अगं हो, पण पहिला मान तुमच्या सुनेचा, तिला आधी करु द्या औक्षवाणं

आजी :- काय वेड लागलं क तुला. ती कसली ओवाळते कुळबुडवी मेली. पहिल्या मुलीची आई आहे ति मुलाची नाही.

प्रवेश तिसरा :

स्थळ : प्रदर्शनात फ़िरताना

मुलगा :- बाबा मला तो महाराजाचा ड्रेस घेऊन पाहिजे.

बाबा :- तुझ्या आईला विचार

आई :- अहो त्यात विचारायचं काय, चला घेऊ या. किती राजबिंडा दिसेल माझा सोन्या तो.

मुलगी :- आई मलासुद्धा तो बार्बीचा ड्रेस घेऊन पाहिजे.

आई :- शांत बस. करायचाय काय तुला बार्बीचा ड्रेस. आत्ता मागच्याच दिवाळीत घेतला न तुला ड्रेस.

प्रवेश चौथा :

स्थळ : घर

वेळ : संध्याकाळी ७ वाजता.

मुलगा :- आई मी बर्थडे पार्टीला जातोय गं. यायला उशीर होईल.

आई :- किती पर्यंत येशील रे बाळा ?

मुलगा :- आई, १२ तरी वाजतील.

आई :- ठिक आहे जास्त उशीर झाल्यास तिकडेच थांब हो.

थोड्यावेळाने

मुलगी :- आई मला खुप भुक लागलीय, जेवायला वाढं.

आई :- या, किती वाजले ? ९.३० ? ही काय घरी यायची वेळ झाली?

मुलगी :- अगं आई. माझा क्लासच ९ ला सुटतो. क्लासनंतर थोडावेळ बोलत बसले आणि घरी आले.

आई :- तुझ्या मास्तरला काय पोरीबाळी नाहीत वाटतं. आणी स्वयंपाकात घरकामात मदत केव्हा करणार रात्री ९:३० वाजता ?

मुलगी :- अगं पण आई, माझा क्लासच ९ ला सुटतो.

आई :- मग काय, तुला ओवाळु ? काही पण नाही आणि बिण नाही. दिवेलागणीच्या वेळी घरी आलंच पाहिजे. सांग तुझ्या सरांना वेळ बदलायला. नाहीतर बंद कर तुझा क्लास. करायचंय काय एवढं शिकुन.

प्रवेश पाचवा :

स्थळ : घर

प्रसंग : नुकतंच सास-याचे दु:खद निधन झालेले आहे. त्यानंतरचा ८ वा दिवस.

सुनबाई :- आई, आता बाबा तर गेले. आता तुम्ही आपल्या तब्येतीकडे नीट लक्ष द्यायला पाहीजे.

सासुबाई :- हो गं पोरी, आता तुमच्या शिवाय मला तरी कोण आहे.

सुनबाई :- हो न ते तर आहेच.

सासुबाई :- बाकी काय तुला काही हवंय का ?

सुनबाई : आई काही नको. तुम्ही खुप काही दिलंय. फ़क्त मला विचारायचंय की आता तुम्हाला या मंगळसुत्राचा काय उपयोग. त्याला तोडुन मला पोहे हार करायचा आहे. मला ते द्यालं?

सासुबाई :- (रडत रडत) सर्व तुझंच आहे मुली, एवढे १५ दिवस होऊ दे मग बघु.

मुलगा :- आई ती म्हणते ते अगदी बरोबर आहे. करायचंय काय तुला ह्या मंगळसुत्राचं. त्यापेक्षा दोन्ही मुलांना चांगले गोफ़ तयार करता येतील.

या सर्व घटना आपल्या जवळपास घडत आहे परंतु आपण निर्विकारपणे सहन करत आहे. या घटनांचा प्रत्यक्षदर्शि मुलगा निमुटपणे बघत त्याला दुजोरा देत आहे. प्रत्येकाच्या संवेदनाच जवळजवळ मॄत पावल्या आहेत.