मराठी कॉर्नर सभासद

Friday, September 10, 2010

सांग ना का परत येऊ मी ?

तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, की तू आणि बाबांनी माझ्यासाठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या, मला उत्तमोत्तम शिक्षण दिलं, परदेशात शिकायला पाठवलं, माझ्या पायावर मला उभं केलं, पण आज तुमच्यामुळे जे मी शिकू शकलो त्याचा काहीतरी उपयोग भारतात होतो का, तूच सांग मला साधी नोकरी तरी मिळेल का? मग सांग ना का परत येऊ मी ?

आज तुझी सून मारिया जरी अमेरिकन असली तरी, तिने तू सांगितल्याप्रमाणे आपल्याकडील सर्व चालीरीती शिकून घेतल्या ना. तूच म्हणतेस की भारतातील मुलीने हे सर्व शिकण्यासाठी नाक मुरडलं असतं पण मारियाने अगदी आवडीने सर्व शिकून घेतलं नव्हे ती त्यात पारंगत झालीय. मग सांग ना का परत येऊ मी?

आज इथे बाबांच्या प्रकृतीची नीट काळजी घेण्यासाठी उत्तमोत्तम दवाखाने आहेत, निष्णात तज्ञ आहेत, त्यांचा दमा कुठल्याकुठे निघून गेला, तुझीपण तब्येत छान झालीय, आज मारियाचे बाळंतपण जवळ आल्यावर तू म्हणतेस की भारतात ये, इथे करू बाळंतपण, पण मी म्हणतोय की, बाळाचा जन्म इथे अमेरिकेत झाला तर आपल्या कुटुंबातील ते पाहिलं बाळ असेल की ज्याला अमेरिकेचे नागरिकत्वाचा अधिकार मिळेल, वर सर्व बाबींचा विचार करता, सांग ना का परत येऊ मी?

आई, आज तुमच्यामुळे जे यश मी अनुभवतो आहे, त्याचा उपभोग घेण्यासाठी तरी तुम्ही दोघेही इथे या? अगं तू म्हणतेस की इथे बाबांचं मन लागत नाही, तू म्हणतेस की इथे तुमच्या दोघांना इथे बोलायला कुणी नाही मग आम्ही दोघे नाही आहोत का? आणि आता आपल्याकडे एक बाळ येणार तरी कुणीच नाही, एकट एकट वाटतं असं कस म्हणतेस?

आई मला माहितीय की आपले सर्व नातेवाईक तिथे भारतात आहेत, पण तूच सांग कितीसे आपल्याकडे येतात आणि आपण तरी कुठेकुठे जातो, ते आहेत तिथे पण फक्त निमित्ताला, एरवी तुम्ही दोघेही तिथे एकटेच असताना, तुम्हाला तसं पाहून माझा जीव कासावीस होतो त्याचं काय, ते काही नाही मला तुमच्यासोबत राहायचंय, तुमची सेवा करायची आहे, इथल्या आणि तिथल्या गोष्टींमध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. तुम्ही इथे आले की तुमच्या दोघांच्या तब्येती किती छान असतात, मला तुम्हा दोघांना अगदी सुखात पहायचंय, तुम्ही तिथे असला तर माझा जीव टांगणीवर असतो, सारखी हुरहूर लागून असते तरी तू सारखी मलाच समजाविण्याचा प्रयत्न करतेस, सांग ना तुम्ही दोघांनी माझ्यासोबत रहाव हि माझी इच्छा असताना सांग ना का परत येऊ मी?

बर आता तुला महत्वाचं सांगतोय, मागल्या वेळी मी जेव्हा भारतात आलो तेव्हा केवळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी दोन तीन जागी अर्ज करून पाहिला होता, पण उपयोग काय, मी जे इथे शिकलो त्या गोष्टीच मुळात भारतात माहिती नाही, तितकं तंत्रज्ञान तिथे विकसित झालं नाही, त्यावर मी स्वत:चा व्यवसाय करायचा म्हणून बँकेत कर्ज मागण्याकरिता गेलो तेव्हा मला २ लाख रुपयांची लाच मागण्यात आली, महामंडळात जागेसाठी अर्ज केला तिथे पण तेच उत्तर, तूच सांग, मी जे शिक्षण इथे घेतलं त्या शिक्षणाचा उपयोग तिथे करायचा म्हटलं तर तेथील लोकांना आणि पर्यायाने सरकारला त्याचे सोयरसुतक नाही. जर माझ्या शिक्षणाचा इतकाच त्रास मला तिथे होतोय तर सांग ना का परत येऊ मी?

मी आणि मारिया तिथे बस्तान मांडण्याच्या दृष्टीने कितीतरी लोकांना, शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या पण जिथे तिथे भ्रष्ट लोकं बसली आहेत, नवीन काही सुरु करतो आणि रोजगाराची संधी उपलब्ध करतो म्हणतो तर तेथील अधिका-यांना तेच नेमकं नकोय, आता केवळ तुझ्या म्हणण्यानुसार तिथे येऊन राहायचे तर केवळ घरीच बसून राहावे लागेल, ते चालेल तुला? मग मला इतकं शिक्षण देऊन मोठ केलसं त्याचा काय उपयोग? तेव्हा तूच सांग ना का परत येऊ मी?

आज माझेजवळ सर्व सोयींयुक्त घर आहे, तुम्हाला नुसतं बसून रहायच आणि तुमची सेवा करू देण्याची संधी मला द्यायची आहे, ज्या परिस्थितीतून तुम्ही आलात त्या परिस्थितीवर मात करून मला यशस्वी केलं त्याची फळे चाखायला तरी तुम्ही माझ्यासोबत असावयास हवं. आज तुझ्या मुलाची अमेरिकेत स्वत:ची कंपनी आहे, विश्वाची सारी सुखं पायाशी लोळण घेत आहे, निदान तुझ्या मुलाचा उत्कर्ष तरी बघायला तुम्ही इथे या. तुझी सून तू सांगितल्याप्रमाणे सर्व सणवार करेल, आपलं घर आनंदाने भरून जाईल निदान या आनंदासाठी तरी तुम्ही दोघेही इथे या.

मी आज इथे ज्या पदावर आहे, ज्या उंचीवर आहे, त्याचा उपयोग तिथे भारतात नाही, माझ्या शिक्षणाचा तिथे कुणालाही फायदा नाही, किंवा तसा उपयोग करून घ्यावयाचा नाही, तशी संधी तिथे नाही, तिथे नियोजनच नाही, त्यामुळे अश्याठीकाणी येण्याचे कसे काय औचित्य असू शकते.

आणि या माझ्या कळकळीच्या विनंतीनंतरहि तुला असं वाटतंय की मी तिथे यावं तर निदान एक तरी चांगल कारण मला दे, मी तिथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार आहे, पण जर या सर्व गोष्टी तिथे घडणारच नसतील तर तूच सांग ना, का परत येऊ मी?

संकल्प

हुंडा हा शब्द तुम्हा-आम्हाला काही नवीन नाही. आज मुलीच्या लग्नाचा खर्च व द्यावा लागणारा हुंडा यामुळे आपल्या देशात स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही सख्या आईवडिलांना व घरातील इतर मंडळींना मुलीचा जन्म नकोसा वाटतो. मुलगी जन्माला आली तर त्यांची तोंड मुरडतात. हि बला आपल्याच नशिबी कां यावी अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया असते. एकीकडे देवीची पूजा करायची, जगदंबा, एकविरा, अंबाबाई, तुळजाभवानी, जगन्माता अशी तिची स्तुती गायची आणि मुलीचा जन्म मात्र स्वागतार्ह मानायचा नाही असे हे दुभंगलेले दुहेरी समाजजीवन किती दिवस चालू द्यायचे ? परंतु दुर्दैवाने याबाबतीतही पुरुषांपेक्षा स्त्रियांचाच पुढाकार अधिक दिसून येतो.

मुलामुलींच्या लग्नात हुंडा देणे व घेणे हि वाईट प्रथा आजही सुरु आहे. आधीच्या काळी मुली अशिक्षित होत्या पण आज परिस्थिती बदललेली आहे. आजची तरुण पिढी शिक्षित आहे. आता तर खेड्यापाड्यात देखील मुली शिकल्या सावरल्या आहेत. त्यांना शिक्षण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य आहे. पण तरी देखील हि प्रथा दिवसेंदिवस वाढतचं आहे. आजकाल खरे पाहिल्यास मुलींनाही आपल्या आईवडिलांनी लग्नात खूप खर्च करावं, लग्न थाटात करावे, हुंडा द्यावा असे वाटते. काय झाले खर्च केलं तर ? एकदाच तर करावं लागतो अशी त्यांची भूमिका असते. म्हणून हुंडा प्रथेच्या अनिर्बंध वाढीकरिता पुरुषाइतकीच स्त्री देखील तितकीच दोषी आहे. हुंड्याची रक्कम किती याकडे बघून जो मुलगा लग्नाला तयार होतं तो स्त्रीचा अपमानच करीत असतो. त्यामुळे कमाई करणारी स्त्री सुध्दा गुलामच राहते. कमाई करणे व आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहणे यात बरेच अंतर आहे. आजपर्यंत अडाणी व खालच्या वर्गातील स्त्रिया मोलमजुरी करून कमाई करतच होत्या. परंतु त्या कमाईवर त्यांचा हक्क नव्हता. आजही सुशिक्षित व नोकरी करण्या-या स्त्रियांचा सुध्दा त्यांच्या पगारावर अधिकार नाही. स्त्रियांना आज नागरिकत्वाचा हक्क मिळाला आहे. वडिलांच्या संपत्तीतहि वाटा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. तरीसुद्धा तिचे भोग संपत नाही. हीच खरी वेदना आहे. आणि स्त्रियांचे भोग संपावेत असे स्त्रियांनाच वाटत नाही. हि या प्रश्नाची खरी शोकांतिका आहे.

हुंडा पद्धती हि समाजसंस्थेला लागलेली कीड आहे. यावर कायदेशीर उपाययोजना करून या दुष्ट पद्धतीला पायबंद घालण्याकरिता सन १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. कायद्यात अनेक तरतुदी दिल्या आहेत, परंतु प्रश्न मात्र मिटले नाही. लग्न झाल्यावर ती आपले घरी जाते, सुखी संसाराची अनेक स्वप्ने डोळ्यात घेवून जाते आणि ती स्वप्नं आसवांच्या रुपात बाहेर पडतात. इकडे नवरा आणि सासरची मंडळी ह्यांची पैशासाठी असलेली भूक मात्र शमता शमत नाही. मग सुरु होतो नववधूचा छळ. जा आपल्या वडिलाकडे आण ५०,०००/-, आण गाडी, अमक आण, ढमक आण, नाही आणलं तर घरात राहू देणार नाही, अशी टोमण्यांची स्पर्धा सुरु होते. त्यांच्या मागण्या वाढतंच जातात. मुलगी जाते आईवडिलांकडे, पण कित्येकवेळा आईवडिलांची परिस्थिती जेमतेम असते. मुलगी जन्माला आल्यापासून पै अन् पै जोडून रक्कम जमा करतात, तिच शिक्षण, लग्न करतात आणि आपली कर्तव्यपूर्ती करतात. पण मुलीचे भोग मात्र संपत नाही. जेव्हा ती रिकाम्या हातानी सासरी परत जाते तेव्हा तिचा शारिरीक, मानसिक छळ सुरु होतो. जीवघेण्या यातना सुरु होतात, तिला मारून टाकण्यात येते, जाळण्यात येते किंवा अनेकदा जीवघेण्या यातना सहन न झाल्याने व त्रास अनावर झाल्याने कित्येक स्त्रिया आत्महत्या करतात आणि आपले जीवन संपवितात. आपण हे सगळं रोज वर्तमानपत्रात वाचतो.

कायद्याने काहीही होत नाही, हुंडा प्रतिबंधक कायद्याने हुंडाबळी कमी झाले नाहीत. ज्यावेळेस कायदा आला त्याचवेळी त्याच्या पळवाटा पण आल्यात. त्यामुळे कायद्याने प्रश्न सुटत नसतो. कायदा वाट मोकळी करून देवून प्रश्न सोडविण्यास मदत करतो. परंतु आज कायदा पाळण्यापेक्षा कायदा मोडणां-यांचेच प्रमाण जास्त आहे. लोकांनी हे कायदे पाळावेत म्हणून लोकशिक्षणाची अत्यंत गरज आहे. अपराध्यांना पकडणे हि पोलिसांची जबाबदारी, त्यांना शिक्षा करणे हि न्यायालयाची जबाबदारी आणि आपण मात्र बेजबाबदार ? अशी भूमिका आता नागरिकांनी घेता कामा नये.

हुंड्याच्या अनिष्ठ प्रथेचा समूळ नाश करायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने मनोमन संकल्प केला पाहिजे. हुंडा मागणा-या मुलाशी मी लग्न करणार नाही असं संकल्प मुलींनी केलं पाहिजे. तसेच भगीनिमंडळाने आपले दिवाणखाने, लग्नमंडप, हुंड्याच्या लग्नाला दिले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल. तसेच सुजाण व जागरूक नागरिकांनी असे गुन्हे घडले तर ते ताबडतोब संबंधित अधिकारी, पोलीस व सामाजिक संस्था ह्यांच्या नजरेस आणून द्यावेत. तसेच प्रत्येक युवकाने जर ठरविले की मी हुंडा घेणार नाही तर या प्रथेचा नयनाट होण्यास जास्त वेळ लागणार नाही अशी आशा आहे. बघुया काय होतंय ते.

मानपान

मानपान हा शब्द मानापमान या शब्दाशी निगडीत आहे. मानपान म्हटलं की लगेच लग्न आठवतं. असं वाटतं की कुणाचं तरी लग्न सुरु आहे आणि नेमकी वरमाय कुठल्यातरी गोष्टीवरून अडून बसलीय. मग कारल्याचा वेल असो, वा चांदीची लवंग असो. पण खरचं मानपान म्हटलं की एवढचं आठवतं का, तर नाही, मानपान किंवा मानापमान म्हणजे अहंकाराची दुसरी बाजू.

आज कित्येक घरात या अहंकारावरून कितीतरी नाती भरकटली गेलीय, तुटली किंवा उध्वस्त झालीय. मग त्या नात्यात नवरा-बायको, मुलगी-आई-मुलगा, मुलगा-वडील-मुलगी, सासू-सून, सासरा-जावई, सासू-जावई, सासरा-सून, एवढेच नव्हे तर बहिण-भाऊ, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी, दीर-भावजय, नणंद-भावजय, एकूण काय नातेवाईक-नातेवाईक. त्यात अजून भर पडते ती मित्र-मैत्रीण, मैत्रिणी-मैत्रिणी, मित्र-मित्र.

आपण म्हणतो की घरोघरी मातीच्या चुली, खरंय ते, कुठल्या न कुठल्या कारणावरून वरील नात्यात सारखे वादविवाद, रुसवे-फुगवे, उणी-दुणी असतात. बरं त्यात काही नात्यात समझोता होतो आणि काही नाती विस्कटून जातात. पुष्कळदा इर्षा, घृणा, यात तिखटपणा आणतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात खरंच अहंकाराची गरज आहे का ? आधीच आपल्या आयुष्याची दोरी त्या बाप्पाच्या हातात असते आणि त्यात हे वाद, अहंकार, मानपान, मानापमान यामुळे आपण शारिरीक आणि मानसिक यातना स्वत:ला करून घेतो आणि त्या अलिखित मृत्यूच्या अजून समीप जातो. ह्यात गंमतीची बाब हि की हीच नाती आपण नीट पाळू शकत नाही आणि उगाच देशांत आणि जगात शांतता असावी अश्या बाता मारतो. आपणचं जर आपल्याच माणसात खुश नसू तर कुठल्या तोंडाने इतर लोकांसोबत खुशहाली आणि शांततेची अपेक्षा कशी काय ठेवू शकतो. कशी नांदेल जगात शांतता ?

त्यासाठी आज खरी गरज आहे, स्वत: मधील मी ला ओळखण्याची, आपण जर मनाने स्वच्छ राहिलो तर कुणाची बिशाद आहे आपल्यावर मानपानाची, अहंकाराची, मानापमानाची, इर्षेची, घृणेची सावली आणण्याची. परंतु मनुष्यप्राणी आणि त्याचा स्वभावच मुळी असा आहे ना, की जाणतेपणी व अजाणतेपणी या दोषांचा संसर्ग आपल्याला होतोच. जर हेच नेमकं टाळता आलं तर जग किती सुंदर असेल. त्यात प्रत्येक नातं अगदी घट्ट, प्रेमाने भारलेलं, हळुवार मनावर फुंकर घालणारं असेल.

रोज आपण निरनिराळी सुवासिक साबणं वापरतो, त्वचा अगदी घासूनपुसून लख्खं ठेवायचा प्रयत्न करतो पण मनाचं काय ? त्याला घासूनपुसून लख्खं ठेवण्यासाठी आपण काहीच करत नाही. म्हणतात ना की, नाही निर्मळ मन काय करील साबण. पण आपण आपला हट्ट, अहं सोडत नाही, मग त्या नात्यात कितीही ताणतणाव आले तरी चालतील पण मी माझं मीपण सोडणार नाही. नका सोडू. राहा भांडत. अगदी नात्यातल्या प्रत्येकाशी भांडत राहा. त्यामुळे कुणाचा फायदा होतो? कुणाचाच नाही. उलट मनस्ताप, अवहेलना, अपमान, अपेक्षाभंग मात्र होतो. पण आपण हे सर्व अगदी आनंदाने उपभोगतो. मुळात आपल्याला नेमकं काय उपभोगायचं तेच मुळी कळत नाही. असल्या भांडणामुळे कुणीच कुणाचं राहत नाही शेवट अगदीच वाईट असतो किंबहुना तो सर्वांना माहित असतो तरी पण आपण वागू नये तसंच वागतो. जणू प्रेम, वात्सल्य, माया, ममता या शब्दांचा आपल्याला तिटकारा आहे.

केवळ एकच विचार आवश्यक आहे, वरील सर्व नात्यात जर प्रेमाची पेरणी केली, त्यावर वात्सल्याचा पाउस टाकला, आणि मायेने आणि ममतेने त्या पिकाचे संगोपन केले तर किती बहारदार वृक्ष आपल्याला पाहायला मिळेल. जग किती सुंदर होईल. कितीतरी लोकांना त्याची मधाळ फळे चाखावयास मिळतील. आयुष्य सत्कारणी लागेल. नाहीतर जन्मलो कशासाठी, जगलो कसे आणि मेलो कशासाठी याचा कुठलाही अर्थ लागणार नाही. किती काळ जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्व आहे.

देवाने आयुष्य दिलंय आणि आयुष्याची सीमारेषा पण आखून दिलीय, मृत्यू नंतर आपले काय होते, कुठला जन्म आपण घेतो हे कोडे अजूनही उलगडले नाही. स्वर्ग आणि नरक कुणी पाहिलाय. त्यामुळे चित्रगुप्ताने प्रत्येक मनुष्याला त्याच्या मृत्यू नंतर पुढील जन्मात घालण्यापूर्वी त्या मनुष्याचा एक लेखाजोखा मांडला पाहिजे, मनुष्याने एकदा जरी मानपान, मानापमान, अहंकार, इर्षा, घृणा आदी गोष्टींचा वापर त्याच्या जीवनात केला असेल तरी त्याला परत मनुष्य जन्म देऊन जोपर्यंत तो प्रेम, वात्सल्य, माया, ममता, असल्या बाबीं त्याच्या जीवनात तो आचरणात आणित नाही तोपर्यत त्याच्या आत्म्याला मोक्ष देता येणार नाही असा नियमच केला पाहिजे.

मग कुठलीही सासू कारल्याच्या वेलीसाठी, चांदीच्या लवंगसाठी अडून बसणार नाही, आणि वर नमूद केलेल्या कुठल्याही नात्यात अहंकार, इर्षा, घृणा, राहणार नाही, मग आयुष्य सुंदर होण्यास कितीसा वेळ लागणार आहे. हे सर्व जेव्हा साध्य होईल त्याचवेळी सर्व जगात शांतता नांदेल आणि प्रत्येकाच्या जीवनाला त्याच्या जगण्याला अर्थ येईल आणि तिच त्याच्या जीवनाची आणि जगण्याची इतिकर्तव्यता असेल. काय पटतंय का ?